२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर दोन दिवसात महाविकास आघाडीच्या सरकारची सत्ता या वेगवान अशा घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात गेल्या दोन वर्षापासून राज्य कारभार चालवला आहे. आता राज्यात आणखी एक राजकीय समीकरण जुळण्याचे संकेत मिळत आहेत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शन पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनी लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं की,’आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला भाजप हासुद्धा एक युतीचा पर्याय असू शकतो.’ या विधानामुळे अर्थातच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर यांनी नेहमीच राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांच्या भाजपशी युतीबाबतच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकामध्ये संपादकीय लेखात भाजपशी युतीबाबतचं विधान केलं आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी म्हटलं की, राजकारणात काँग्रेस-शिवसेना हे कट्टर विरोधक एकत्र येऊ शकतात मग इतरांनी का येऊ नये? संभाजी ब्रिगेडला जर काँग्रेस-राष्ट्रवादी गृहित धरणार असेल आणि फक्त आमच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणार असतील तर आम्हालाही तडजोड करून वेगळा पर्याय पाहावा लागेल. किमान समान कार्यक्रमासारखीच भाजपशी युती होऊ शकते असेही भानुसे यांनी सांगितलं.
मराठा सेवा संघ हा आरएसएसच्या विचारधारेचा विरोध करणारा आणि भाजप हा आरएसएसच्या मुशीतून तयार झालेला पक्ष आहे. त्यामुळे दोन्ही विरोधी विचारधारांमध्ये युतीबाबत खेडेकरांनी भाष्य केल्यानं नव्या राजकीय समीकरणाचे हे संकेत आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. खेडेकरांच्या भाजपशी युतीबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा होत आहे. त्या भाजपच्या आमदार होत्या. तेव्हाही पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरएसएससह भाजपवर टीका केली होती.









