कालचे श्री गणेश विसर्जन आणि येत्या काळात येणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता, हि तिसऱ्या लाटेची चाहूल तर नाही ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे, परंतु नागरिकांत त्याचे गांभीर्य पाहायला मिळत नसल्याचे अहवालातून समोर आले आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जो हाहाकार माजवला होता त्याची तीव्रता जरी कमी होताना दिसात असली तरीही आता तिसरी लाट यापेक्षाही अधिक तीव्र आणि गंभीर स्वरुपाची असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीसह, राज्य स्तरावर आरोग्ययंत्रणांची तयारी सुरु आहे. याच धर्तीवर विविध शहरांतील आरोग्ययंत्रणांच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. आरोग्य यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी विविध पातळीवर सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तिसऱ्या लाटेत एका दिवसात १५ ते २० हजार रुग्ण असतील, असा अंदाज गृहीत धरून यंत्रणांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 27 मार्च 2021रोजी सर्वाधिक 11 हजार 226 सक्रिय रुग्ण दाखल झाले होते. यातील बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले असण्याची शक्यता आहे.









