‘आयुष्मान भारत राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन‘ या योजनेत देशातील आरोग्य यंत्रणेत क्रांतिकारी बदल घडविण्याची ताकद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते आज या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेचे उद्घाटन झाले. मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना या मोहिमेची घोषणा केली होती. सुरवातीला ही योजना सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहे.
देशाची आरोग्य पायाभूत सेवा मजबूत करण्याची सुरु असलेली मोहिम आज नव्या पर्वात प्रवेश करते आहे. आज सुरू झालेल्या या मोहीमेत भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडविण्याची ताकद आहे, असे मत मोदिजीनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते. याद्वारे आरोग्य व्यवस्था डिजीटल माध्यमातून सर्वांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागात पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याद्वारे देशातील साऱ्या सरकारी रुग्णालयांना डिजीटल आरोग्य यंत्रणेशी जोडले जाईल आणि नागरिकांना त्यांचा ‘हेल्थ आयडी‘ सांगताच दुसऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयांतही आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल. सरकारच्या कल्पनेप्रमाणे, या योजनेत प्रत्येक नागरिकांचा एक ‘आरोग्य ओळख क्रमांक‘ तयार करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रत्येकाचे डिजीटल हेल्थ कार्ड तयार होईल. यामुळे रूग्णांना डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी आपली फाईल घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. डॉक्टरांनाही एका क्लिकवर संबंधित रूग्णाचा आरोग्य इतिहास आणि प्रकृतीतील चढउतार पाहण्याची सोय उपलब्ध होईल.










