अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रणात शेती व शेतपिकांचे, गुरे जनावरांचे नुकसान झाले आहे त्याच बरोबर शहरी भागासह गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुकाने, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाधित भागातील नागरिक मोठ्या संकटात सापडले असून झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासनामार्फत आपत्कालीन मदत मिळवून देण्याकरिता ना.डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे पत्र देऊन भ्रमणध्वनीवरून चर्चा करत सूचना केली आहे.
जिल्हयात अतिवृष्टीमुळे ३४ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव येवला व नांदगाव तालुक्यात झाले आहे. मका पिकाचे सर्वाधिक नुकसान असून त्या खालोखाल बाजरीचे नुकसान असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. पंचनामे केल्यानंतर या नुकसानीची वास्तवदर्शी माहिती उपलब्ध होऊ शकेल.
मका, बाजरी, सोयाबीन, कांदा रोपवाटिका यांचे २२३४५ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात मका, बाजरी, फळबागा यांचे १०५४४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने दर्शविला आहे. त्यानंतर निफाड तालुक्यात मका, सोयाबीन, कांदे यांचे १७७० हेक्टरवर नुकसान झाले असून दिंडोरी तालुक्यात १० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.
जिल्ह्यात खरीप व लेट खरिप कांद्याच्या साधारण ९२०० हेक्टरवर रोपवाटिका असून त्यापैकी २५५२ हेक्टर क्षेत्रावरील रोेपवाटिकांना या पावसाचा फटका बसला आहे. खरिपातील मकाचे सर्वाधिक १८९६५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. सोयाबीनचे १३८१ हेक्टरवर नुकसान झाले असून बाजरीचे ६४५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. कपाशीचे सर्वाधिक नुकसान मालेगाव तालुक्यात झाले आहे. तेथे ४५६६ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे.
तसेच अतिवृष्टीमुळे ठीकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अगोदरच आरोग्य यंत्रणेंला सतर्क करून साथीच्या रोगांना वेळीच आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपायजोजना कराव्यात जेणेकरून अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या नागरिकांना ह्याचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्याची पथके तयार ठेवण्याच्या सूचनाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.











