कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या माध्यमिक शाळा राज्य शासनाने सुरु केल्या आहेत मात्र पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे, त्यातच राज्य सरकार दिवाळी नंतर प्राथमिक शाळा देखील सुरु करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसा आराखडा देखील शासनाला सादर करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्राथमिक शाळा देखील दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शिक्षण दिनी सुरू होऊ शकतात. शहरातील शाळांवरील निर्बंध शिथिल करून कोरोनामुक्त प्रभागांमधील सर्वच शाळा सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्या शाळांची स्वच्छता सुरू करण्यासंबंधीच्या सूचनाही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.












