काँग्रेस आमदार धीरज देखमुख यांच्या प्रतिष्ठेची असलेली लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा प्रणीत पॅनलच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले झाल्यामुळे आमदार धीरज देखमुख पॅनलचा लढाई आधीच विजय झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, 19 संचालक निवडून देण्यासाठीची निवडणूक लागली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित 15 जागांसाठी काँग्रेसचेच 31 अर्ज शिल्लक राहिले आहेत . अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी आहे.
काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजपने थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज काही ना काही त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहेत. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्ज बाद करण्याचं राजकारण केलं गेलं. या विरोधात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू असं भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाप्रणित पॅनल उभे करण्यात आले होते. मात्र अर्ज छाननीत या पॅनेलचा एकही अर्ज वैध ठरला नाही. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक जिंकल्याचा फक्त सोपस्कार उरला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, जळकोटचे मारोती पांडे, चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.










