मागील महिन्यात आयोजित आरोग्य सेवेतील पदभरतीत उडालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप सरता सरत नसताना आता विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध ट्विटरद्वारे एल्गार केला आहे. उमेदवारांना चुकीचे प्रवेशपत्र, प्रवेशपत्र न मिळणे, राज्याबाहेरील परीक्षा केंद्र आदी तक्रारी आल्या होत्या.
त्यातच लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्याची तारांबळ उडाली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर नाहीयेत तसेच एकाच बेंचवर दोन विद्यार्थी कसे बसू शकतात? असा सवाल देखील विद्यार्थी करत आहे. इतकंच नव्हे तर एकाच दिवशी दोन शहरांतील दोन केंद्रांवर पेपर असणारे हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी ट्विटरवर आपला संताप व्यक्त करत आहेत.









