करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अर्थचक्राला गती देण्यासाठी बहुतेक सर्वच आस्थापना आणि व्यवहार आता सुरू झाले आहेत. असे असताना कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन निर्बंध शिथील करताना तितकीच दक्षता घेण्याचेही सरकारने ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आज आदेश जारी केला आहे.
असा आहे आदेश…
१. राज्यातील मंत्रालय, अधिनस्त कार्यालये, विधानभवनासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२. या सर्व कार्यालयांमध्ये सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख वा आस्थापना प्रमुख यांनी करावी. लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी काही अडचण असल्यास लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित करावे किंवा नजीकचे केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून त्याची पूर्तता करून घ्यावी.
४. सर्व कार्यालयांत मास्क अनिवार्य असल्याने कर्मचारी, अधिकारी किंवा अभ्यागत हे कार्यालयात किंवा आवारात विनामास्क आढळल्यास संबंधित नामनिर्देशित अधिकाऱ्याला नियम मोडणाऱ्याकडून दंड वसुलीचे अधिकार असतील.
५. दंड आकारणी केल्यावर त्याची पावती दिली जाईल. ती रक्कम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे जमा होईल व तिथून महसुलात जमा करण्यात येईल.












