आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारला आहे. त्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असून दिवाळी निमित्त शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात यावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता २८ % फरकासह अदा करण्यात यावा, घरभाडे भत्ता ७,१४,२१ टक्क्यांवरून ८,१६,२६ टक्के करण्यात यावा, राज्य सरकार प्रमाणे सण उचल १२,५०० रुपये दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी, दिवाळी पूर्वी १५००० रुपये बोनस देण्यात यावा, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या २ दिवसापासून बेमुदत उपोषण करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड आदिसह सर्वच आगारातून उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एकीकडे एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे.












