शिवसेनेसाठी कायम प्रतिष्ठेची असलेली मुंबई महानगर पालिका पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा धडाका लावला आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीवर शिवसेनेने सर्व लक्ष केंद्रित केले असून युवा सेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात निवडणुकीची सर्व सूत्रे असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी पालिकेत पक्षाचे संख्याबळ वाढवायचे असून बंडखोरी टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत तसेच इच्छुकांची चाचपणी करण्यात येत आहे.
सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचे बहुमतांची गरज असलेल्या महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४ नगरसेवक आहेत. यावेळी सेनेने मिशन १०० चा नारा दिला आहे. सेना महाविकास आघाडीत असली तरी पालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहे. पक्षांतर्गत सूत्रे परिवहन मंत्री व सेना नेते अनिल परब यांच्या हाती असणार आहेत.
मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार असून सदस्य संख्या पूर्वीप्रमाणे २२७ इतकीच आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १५, जमातीसाठी २ तर ओबीसीला ६१ जागा राखीव आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुंबईत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार हे निश्चित आहे.










