जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहाला केंद्र सरकारचे तब्बल 22 हजार कोटींचे लष्करी विमान निर्मितीचे कंत्राट मिळाले आहे. सदर प्रकल्प नाशिक जिल्ह्यात उभा करण्यात यावा, यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी थेट टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. सदर प्रकल्प नाशिक जिल्ह्यात उभे करण्याचे निमंत्रण पालकमंत्री यांनी रतन टाटा यांना दिले आहे.
टाटा समूहाकडून देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये याबाबत चाचपणी सुरू आहे. नाशिक या प्रकल्पासाठी सर्वार्थाने योग्य आहे. कारण इथेच एचएल कंपनी आहे. शिवाय मुंबईपासून नाशिक हाकेच्या अंतरावर. रेल्वे, विमानसेवा देखील आहे. नाशिकचे वातावरणही निसर्ग समृद्ध आणि रमणीय. या बाबींचा विचार करून टाटांनी या प्रकल्पासाठी नाशिकचा विचार करावा, असे आवाहन भुजबळ यांनी घातल्याचे समजते. केंद्र सरकार आणि टाटा यांच्या प्रकल्पातून तब्बल 6 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात लष्कर आणि हवाई दलासाठी सी 295 प्रकारातील 40 विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. भुजबळ यांच्या या प्रयत्नांचे उद्योग जगताकडून स्वागत केले जात आहे. हा प्रकल्प नाशिकमध्ये आला तर, हजारो नोकऱ्यांची निर्मिती होईल.












