मानवी जीवनात आपणांस जन्म देणाऱ्या माता पित्याचे स्थान अत्यंत उच्च दर्जाचे आहे.व्यक्तीस स्वतःची ओळख म्हणून व्यक्तीला स्वतःचे नाव आहे. शाळा विद्यालयात व्यक्तीचे स्वतः (विद्यार्थी) नंतर पित्याचे व शेवटी त्याच्या कुळाचे (आडनांव) नांव लिहिण्याचा प्रघात आहे. अशा प्रकारे नाव लिहिताना आईच्या नावाचा कोठेही उल्लेख आपणास दिसत नाही.
शाळेच्या दाखल्यावर गेल्या काही वर्षांपासून आईचे नाव असा स्वतंत्र भाग (कॉलम) लिहिला आहे . त्याचे स्वागत करून सर्व प्रकारचे दाखले कागदपत्रे प्रमाणपत्र यात व्यक्तीचे नाव वडिलांच्या नावासोबत आईचे नाव कायदेशीर नोंदवले जाणे बंधनकारक करावे या करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक, राष्ट्रीय बालक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण, प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक, जन साथी सामाजिक संस्था यांच्या वतीने अभियान करण्यात आले आहे.
यात मुख्य मागणी हि सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालयीन, सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापना यात भारत व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे नाव हे प्रथम व्यक्तीचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व शेवटी आडनाव (कुळ) अशा क्रमाने नोंदविण्यात यावे. भारतातील सर्व नागरिकांनी आपले नाव लिहिताना प्रथम व्यक्तीचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व शेवटी आडनाव (कुळ) अशा क्रमाने लिहावे सरकारी दप्तरी नोंदवावे, असे आवाहन आई नाव सरकारी दप्तरी नोंदवा अभियानचे प्रमुख शरद विमल दिनकर शेजवळ यांनी निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारला केले आहे.
सरकारने मागणीचा गांभीर्याने विचार करून तसा आदेश सर्व सरकारी शाळा, महाविद्यालय, सरकारी आस्थापना यांना द्यावा अशी मागणी शरद शेजवळ, वनिता सरोदे-पगारे, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, नितीन केवटे, स्नेहल सोनटक्के, महेंद्र गायकवाड, अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ, अतुल डांगळे, दीपक शिंदे, कुलदीप दिवेकर यांनी सरकारकडे केली आहे.












