एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक आहेत. त्यात भाजपा आणि मनसेसारखे पक्षही या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. आजच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबई येथे मंत्रालयावर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दरम्यान, सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेकपोस्ट इथं अडवण्यात आले. पोलिस बंदोबस्त लावून कर्मचाऱ्यांना अडवले जात असल्याना सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध करीत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आज एसटी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा सकाळी मंत्रालयावर धडकला, यात हजारो एसटी कर्मचारी सामील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारही कठोर पावले उचलताना दिसते आहे. मुंबईच्या सीमांवर एसटी कर्मचाऱ्यांना रोखण्यात येत असल्याची माहिती आहे.
संपावर गेलेल्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना महामंडळाने काल निलंबित केले आहे. जीआर काढूनही कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला नसल्याने सरकारही कठोर झाल्याचे दिसत आहे. न्यायालयाचा संप न करण्याचा आदेश धुडकावून लावत कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवल्याने, कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिकाही सरकारकडून दाखल करण्यात येणार आहे. आज त्यावर कोर्टातही सुनावणी होण्याची शक्यता आहे












