संपूर्ण जिल्हयाला प्रतिक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी गट, गण रचना करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहे. सन २०११ची लोकसंख्या गृहीत धरून ३० नोव्हेंबरपर्यंत ही गट व गण रचना करण्याची कार्यवाही पूर्ण करावी अन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर गट आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
याबाबत, राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (दि.१८) रात्री उशीरा पत्र प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. साधारण ही मुदत संपण्यापुर्वी सहा महिने जिल्हा परिषदेची गट व पंचायत समितीची गण रचना सुरू होते. जि.प. अध्यक्षांचे आरक्षण देखील पडले जाते. गत पाच पंचवार्षिक निवडणुका दरम्यान ऑक्टोबर महिन्यातच गट रचना होऊन गटाचे आरक्षण पडले होते. मात्र, निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना गट, गण रचना व आरक्षणाबाबत हालचाली नसल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला पत्र देत गट व गण रचना करण्याचे आदेश बजाविले आहे. गट व गण रचना करतांना सन २०११ची लोकसंख्या विचारत घेण्यात यावी. गट रचना करण्याची पध्दत आयोगाने निश्चित करून दिली आहे. यात साधारण गृहीत धरावयाची लोकसंख्या, कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती, गटांची मांडणी, गटांची संख्या निश्चिती, सरासरी लोकसंख्या, गट, गण रचनेची दिशा यांचा विचार करावा असे सुचविले आहे. गट, गण करतांना तो फोडू नये, अपवादात्मक परिस्थितीत फोडायचा झाल्यास त्यांची प्रणाली देण्यात आली आहे. तयार करण्यात आलेला गट, गण रचनेचा कच्चा आराखडा गोपनीय ठेवण्यात यावा, आरक्षण जाहीर होईपर्यंत कोणासही माहिती देऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत.












