तालुक्यातील महसूल व पंचायत समितीच्या यंत्रणेलाच जर केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देता येत नसेल तर ते पुढे सामान्य जनतेपर्यंत योजना कशाप्रकारे पोचविणार असा संतप्त सवाल केंद्रीय राज्यमंत्री ना.भारती पवार यांनी विचारात नांदगाव येथील आढावा बैठकीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभापासून लोक वंचीत राहता कामा नये, अशी कानउघाडणी देखील त्यांनी केली.
ना.डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १९) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रातील योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याची माहिती मिळत नसल्याने खेद व्यक्त करण्यात आला. अपूर्ण माहिती व अकार्यक्षम प्रशासन यातील अनेक नकारात्मक बाबींनी आढावा बैठक चर्चेचा विषय ठरली, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने खुर्च्या मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी धावपळ केली. सगळे आसनस्थ झाले तर सदोष ध्वनीक्षेपण यंत्रणेमुळे बैठकीतले विषय व्यासपिठाजवळ बसलेल्या पुढच्या रांगेशिवाय इतर कोणालाही ऐकू आले नाहीत. त्यामुळे आशेने बैठकीला आलेले कार्यकर्ते व इतरांना गोंधळात बैठकीतील महत्वाचे मुद्दे नीट समजलेच नाहीत.
नांदगाव – मालेगाव, मनमाड – येवला रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे खड्डे कधी बुजविणार0 तारीख,वार सांगा अर्धवट रस्त्याची कामे कधी पुर्ण करणार यावर अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. बैठकीस तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चोधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कातकडे, नितीन पांडे, संजय सानप, सजन कवडे, तालुकाध्यक्ष बापू जाधव, मूनवर सुलतान आदी उपस्थित होते.












