देशात सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून दिल्ली शहर कायम चर्चेत राहिले आहे, जगात सगळीकडे होणारे प्रदूषण कारखान्यापेक्षा जास्त वाहनांतून होते. त्यामुळे संपूर्ण जग हो ग्लोबल वॉर्मिंगला सामोरे जात असून, त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागत आहेत. नाशिकची दिल्ली सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून आजपासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात रविवारी Go Green Cab सेवा सुरू करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात या सेवेला हिरवा झेंडा दाखवला.
एरवी घर संसाराची गाडी ओढणाऱ्या महिलांनी यात मोठा पुढाकार घेतला आहे. ‘गो ग्रीन’च्या संचालिका हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी इलेक्ट्रिक कॅब्स सर्व्हिसेस च्या माध्यमातून ‘गो ग्रीन’ ही सेवा सुरू केली आहे. नाशिककरांना पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी जोडू पाहणारे आयुष्य देणे, नाशिकमध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठीच इलेक्ट्रिक कॅब्स ही संकल्पना उदयास येऊन, ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
Go Green Cab सर्व्हिसेसचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, साहित्य संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार, गो ग्रीनचे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या, श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढय्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.












