गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असेलेले एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली. सध्या एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याची बाब ही हायकोर्टाच्या समितीसमोर असल्याने तो निर्णय तातडीने घेता येणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र, अंतरिम पगार वाढ देण्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. यासंदर्भातच माहिती देण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री अनिल परब, गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील हजर होते.
विलीनीकरणाचा निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात आज पर्यंतची सर्वाधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. डीए, घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. जे कर्मचारी एक वर्ष ते १० वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मूळ वेतन १२०८० असल्यास आता वेतन १७ हजार ८० रुपये झालं आहे. मूळ वेतन १७ हजार असणार्यांचे आता २४ हजार पगार होणार आहे. ही वाढ ४१ टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. १० ते २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ हजाराने वाढ केली आहे. २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन पाचशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.












