राज्य शासनाने इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केल्यानंतर सुध्दा कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, यामुळे एस.टी.कर्मचारी आंदोलनाचा तेढ अजूनही कायम असुन यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. मात्र, या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटना आज, गुरुवारी निर्णय जाहीर करणार आहेत.
विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले. यामुळे महिन्याला ६० कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडेल.
वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.









