मनमाड : ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. आज रविवार 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी.
ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. ज्योतीबांचा वडीलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852 मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला समाजातील काही व्यक्तींकडुन सतत विरोध होत असे. पण ज्योतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिराव फुलेंनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यांची समाजसेवा पाहून 1888 मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी देण्यात आली होती.फुलेंनी त्यांच्या जीवनकाळात अनेक पुस्तके लिहली आहे.
महात्मा फुले यांचे 28 नोव्हेंबर 1890 साली निधन झाले. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या थोर महापुरूषाला विनम्र अभिवादन.












