निवडणूक आली कि नेहमीच टिकीट वाटपातील घोळ आणि नंतरची नाराजी यांचा सर्वच पक्षांना सामना करावा लागतो. फेब्रुवारीत होऊ घातलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पक्षांना याचा त्रास होऊ नये म्हणून सर्वच पक्ष वेगवेगळी शक्कल लढवत आहे. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी भाजप पासून ते शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र निवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. अनेक पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्यालाच टिकीट मिळणार म्हणत प्रचारही सुरू केलाय. एकाच पक्षातून अनेक जण निवडणूक लढवायला इच्छुक असतात. प्रत्येकाला टिकीट मिळेल याची खात्री नसते आणि नंतर यातूनच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होतात. मात्र, या कार्यपद्धतीतही आता सुधारणा होत आहे. अंतर्गत नाराजी व वाद टाळण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळ्या मार्गाने तयारी करीत आहेत.
नाशिक महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने टिकीट वाटपातील नाराजी व घोळ दूर व्हावा यावर उपाय म्हणून सामूहिक निर्णयाचे तत्व स्वीकारले. हे निर्णय घेण्यासाठी एका सुकाणू समितीची स्थापना केली. त्यात आजी-माजी आमदार, महापौर आणि ज्येष्ठ पदाधिकारी घेतले. त्यात आता निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे शहर प्रभारी जयकुमार रावल यानी विभानिहाय समित्या घोषित केल्या. या समित्याच महापालिकेत कोणाला उमेदवारी द्यायची, हे शिफारस करणार आहेत.
भाजपचा हाच कित्ता शिवसेना व काँग्रेस पक्षात देखील गिरविला जात आहे, कदाचित यातून टिकीट वाटपातील घोळ व नाराजी काहीशी दूर होण्यास मदत होईल हीच अपेक्षा सर्वाना आहे.












