रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्या सह त्या आपल्या दाभोळजवळील वंणदगावात राहत होत्या. त्यांचे वडिल भिकू धोत्रे हे दाभोळ बंदरातील माश्यांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचविण्याचे काम करीत असतं. रमाबाई यांचे कुटुंब एक मोठ कुटुंब होतं. त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबतच त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले. आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता. कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी आली होती. यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेल्या.
रमाबाई आपल्या भावंडासोबत मुंबईत आपल्या काका व मामा सोबत राहत होत्या. त्या काळी बालविवाह प्रथा समाजात रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह त्यांच्या लहानपणीच करण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होते. त्यांना भायखळ येथे लग्नाची मुलगी आहे असे समजले. त्यांनी वलंगकर यांना लग्नाची मागणी केली. रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये ई.स. १९०६ साली झाले. लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय १४ वर्षाचे तर, रमाबाई ह्या केवळ ९ वेर्षांच्या होत्या. रमाबाईंनी आपल्या जीवनात खूप दु:ख सहन केलं आहे.
रमाबाई यांचे लग्न त्याकाळीन बाल विवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब ई.स. १९२३ साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागलेत. त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.
बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप मरण पहिली व ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या. कारण, लहान पणीच आई व त्यानंतर वडिल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या ७ वर्षानंतर वडीलांसमान सासरे रामजी सुभेदार यांचा ई. स. १९१३ साली मृत्यू झाला. ई.स.१९२१साली रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठ दुखद घटना घडली ती म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर, व ई.स.१९२६ मध्ये राजरत्न यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला. हे सर्व त्यांच्या सोबत घडत असतांना देखील त्यांनी या बद्दल बाबासाहेबांना काहीच कल्पना दिली नाही. घरातील एकेक जणांचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या.
आपला उदरनिर्वाह करण्या करता त्या शेन गवऱ्या तसच सरपणासाठी वनवन फिरल्या. अश्याप्रकारे रमाबाई आंबेडकर यांनी कुणालाही चाहूल न होऊ देता, आपला व आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या पहाटे सूर्योदयापूर्वी आणि रात्री आठ वाजल्यानंतर गोवऱ्या थापायला वरळीत जात असतं.
रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केले. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगले. जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरिर पोखरून गेले होते. त्यांना आजार बळावला होता. ई.स. १९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे १९३५ साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते. त्यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती. बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असतं. असेच काही दिवस सुरु असतांना २७ मे १९३५ साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली. रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान खूप मोठ आहे. बाबासाहेब यांच्या बॅरिस्टर बनण्यामागे रमाबाई यांचे खूप मोठे योगदान आहे.












