सिन्नर तालुक्यात महावितरणची मोटारसायकलद्वारे रॅली
कृषी वीजबिल थकबाकीच्या सवलतीचा कृषी ग्राहकांनी लाभ घ्यावा
: मुख्य अभियंता दीपक कुमठेकर
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी ही सुवर्ण संधी असून, कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीजास्त कृषी ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले.
महावितरणच्यावतीने कृषी वीजदेयक थकबाकी वसुलीसाठी नव्हे तर कृषी वीज धोरणाबाबत सिन्नर तालुक्यात जनजागृती करण्यासाठी आयोजित सिन्नर तालुकयातील बेलू या गावात मोटारसायकलद्वारे रॅलीचे फीत कापून उदघाटन केल्यानंतर ते ग्रामस्थ व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्याकरिता व या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ३१ मार्चपर्यंत कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.त्याप्रमाणे जिल्ह्यातील साडेतीन लाख कृषिपंप धारकांकडे निर्लेखन विलंब आकार आणि व्याजातील सुट देऊन २ हजार २७६ कोटी सुधारित थकबाकी भरावयाची आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३०१ कोटी रुपयांचा कृषी आकस्मिक निधी जमा झाला आहे. सदर निधी हा ग्रामपंचायत व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळणार आहे. असे सुद्धा मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले.
बेलू या गावातून सकाळी निघालेली रॅली पांढुर्ली, शिवडा, कोनांबे, सोनांबे, सोनारी, डुबेरे, आटकवडे, मानेगाव, सिन्नर, बारागाव, पिंपरी, गुळवंच, देवपूर, वडांगळी, मेंढी, सोमठाणे, पंचाळे, धनगरवाडी, पांगरी, मऱ्हळ, नांदूर शिंगोटे, या मार्गाने जवळपास १५० किलोमीटर या सर्व गावांमध्ये कृषी योजनेची जनजागृती करीत दुपारनंतर गोंदे या गावात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये सिन्नर १ व २ या उपविभागातील अभियंते, कर्मचारी, अधिकारी, जनमित्र , यंत्रचालक आणि कंत्राटी कर्मचारी हे सर्व मिळून १७५ जणांनी सहभाग घेतला. सदर गावातुन मार्गक्रमण करीत ग्रामस्थांना जनजागृती करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याचे गावांमध्ये शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच वीज जोडणी खंडित झालेली नसताना सुद्धा स्वयंस्फूर्तीने १३ शेतकऱ्यांनी कृषीदेयकाच्या थकबाकी पोटी असलेले ११ लाख ५० हजार रुपयाचा भरणा सुद्धा या रॅलीत केला.
तसेच सोमठाणे येथे आमदार माणिकराव कोकाटे यांनी कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० योजनेची जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीचे स्वागत करीत सर्व सहभागीकरिता चहा व पाणी याची व्यवस्था केली. तसेच या उपक्रमाचे कौतुक करीत वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी अशाचप्रकारे लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या रॅलीमध्ये त्यांनी प्रत्येक गावात कृषी योजनेची विस्तृत माहिती ग्रामस्थाना दिली. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी केले.
बेलू येथील रॅलीच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक सिन्नर २ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन सिन्नर १ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी केले.














