गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या चटक्यात भरपूर वाढ झाली आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा कमी होऊन एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना देखील आता राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे.
कुठे पडणार पाऊस:
आता राज्यातील कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात आजपासून 3 ते 4 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्वाचं ट्वीट केलं आहे.
एप्रिल महिन्यातील 5 तारखेला म्हणजेच उद्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आता यलो अलर्ट जारी केला गेला आहे. तसेच 6 एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाट होऊन पाऊस पडू शकतो. कोकणातील नागरिकांना देखील गर्मीपासून दिलासा मिळणार आहे.
गेल्या 29 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट जबरदस्त होती. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागल्या. काही ठिकाणी तापमान तब्बल 43.5 अंशाच्या वर पोहोचले होते. यामुळे उष्माघाताचे बळी देखील जात आहेत. यामुळे हवामान विभागाने काळजी घेण्याचं आणि दुपारच्या उन्हामध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
गेल्या मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवला. सध्या विदर्भात पारा सध्या 41 ते 43 अंशांवर असला तरी उर्वरित महाराष्ट्रात काल सरासरी तापमान अंदाजे 40 अंशांच्या दरम्यान होते. गेल्या काही वर्षांत आपण दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे पाहत आहोत. मार्च महिना सुरू होताच कमाल तापमान रेकॉर्ड मोडून दुसरीकडे जागतिक तापमान वाढत आहे. विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेची लाट आता तरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.












