मनमाड :- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे मनमाड येथे एका दवाखान्याच्या उद्घाटनासाठी आले असता “बत्ती गूल” झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली. एका खासगी कार्यक्रमात बोलत असतानाच दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे हे विजेच्या प्रश्नावर बोलत असतानाच विद्युत पुरवठा खंडित झाला. यानंतर माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यातील वीज संकटाला आताचे केंद्र आणि तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. केंद्र सरकार कोळसा पुरवठा सुरळीत करत नसल्याचा आरोपही तनपुरे यांनी यावेळी केला. फडणवीस सरकारच्या काळात वीज निर्मितीचा एकही नवा प्रकल्प तयार झाला नाही, कुठल्याही प्रकल्पची क्षमता वाढली नसल्याचे ते म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ते दर केंद्र सरकारला कमी करायला सांगा असे तनपुरे राज्यातील विरोधी पक्षांना म्हणाले. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विरोधी पक्ष विसरला असल्याचे तनपुरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भविष्यात विजेच्या बाबातीत स्वंयपूर्ण होण्यासाठी भुसावळच्या प्लांटचे काम सुरु आहे. आणखी काही खासगी वीज कंपन्यांशी करार करता येतील का यावर चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम सुरु आहे. राज्य शासनाने महावितरणला आर्थिक मदत केली तर ही योजना आणकी प्रभावी राबवता येईल. याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बोललो असल्याचे तनपुरे म्हणाले. भविष्यात महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करु असेही ते म्हणाले. भाजपने आरोप करण्याआधी विचार करावा. केंद्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याने भारनियमन होत आहे. रोजच्या मागणीनुसार कोळशाचा पुरवठा कमी होत आहे. चढ्या भावाने वीज खरेदी करत आहोत. भाजपच्या काळात अकही नवीन प्रकल्प झाला नाही. जे प्रकल्प आहेत त्यांची क्षमता भाजपच्या काळात वाढली आहे का? असा सवालही तनपुरे यांनी भाजपला केला. तुम्ही या राज्याला विजेच्या बाबातीत स्वंयपूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊस उचलले नाही. तुम्ही महावितरणची परिस्थिती नाजूक केली आहे. त्यामुळे भाजपला बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे तनपुरे म्हणाले.













