भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा आपल्या एकुलत्या एक मुलासह नगर जवळ कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली.
बाजीराव त्र्यंबक मिस्कर (वय ३८), साई (वय १२) हनुमान नगर, मनमाड असे मृत पिता पुत्राचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात पंजाबमधील हिस्सार येथे कार्यरत असलेले जवान बाजीराव मिस्कर हे भावाच्या वर्षश्राध्दासाठी सुट्टीवर मनमाड येथे आले होते. नुकतेच त्यांच्या मेहुण्याचा विवाह झाला होता. आपल्या मुलासह स्वत:च्या अल्टो कारने रविवारी रात्रीमनमाड येथून जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी जात असताना काळाने या पिता पुत्रावर झडप घातली.अपघात इतका भीषण होता की त्यात कारचा चक्काचूर झाल्याने दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने नगरकडे धाव घेतली. या घटनेने शहर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान मनमिळावू असलेले बाजीराव सर्वांना परिचित होते. ते सुट्टीवर आल्यानंतर सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना भेटत होते. देवाला जाताना त्यांच्यावर काळाने क्रूर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, दोन भावजयी असा परिवार आहे.












