केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत.जाळपोळीचे हे लोण आता १३ राज्यात पसरले असल्याने याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. यामुळे भुसावळ विभागात धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातील प्रवासांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
मनमाड जंक्शनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात ये-जा करणाऱ्या रेल्वे येथूनच मार्गस्थ होतात. मात्र या आंदोलनामुळे काही गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मनमाड जंक्शनमधील प्रवासांचे वेळापत्रक कोलमडले आहे. भागलपूर कुर्ला रेल्वे रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १२३२१ हावडा – मुंबई मेल सहा तास विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १७०५७ सिकंदराबाद- मुबंई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस तब्बल बारा तासाच्या विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १२५२० कामाख्या – कुर्ला नऊ तास उशिराने धावत होती. गाडी क्रमांक १७००१ साईनगर- सिकंदराबाद एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतावी – पुणे झेलम एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १२७३० निजामुद्दीन- वास्को गोवा एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होती. गाडी क्रमांक १२१५० दानापूर- पुणे एक्स्प्रेस ही गाडी आज रद्द करण्यात आली. त्यामुळे मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकात प्रवास करणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक प्रवासीगाड्या मोठ्या विलंबाने धावत होत्या.
प्रशासनाने जाहीर केल्यानुसार गाडी क्रमांक १२२९६ दानापूर- बंगलोर ही गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १३२०१ दानापूर- कुर्ला, गाडी क्रमांक १२१५० दानापूर- पुणे, गाडी क्रमांक १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते पाटलीपुत्र, गाडी क्रमांक १७००१ साईनगर- सिकंदराबाद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०६३ / ६४ मनमाड – सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०३४ दरभंगा- पुणे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०५७ / ५८ सिकंदराबाद- मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या महत्त्वपूर्ण प्रवासीगाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केले आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे विभागातून मनमाडमार्गे सिकंदराबाद, साईनगर, शिर्डी येथे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. हजारो प्रवासी शिर्डी येथून मनमाड येथे येतात व येथून दक्षिण भारतात जाण्यासाठी रेल्वे पकडतात; पण नेमक्या या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.












