हिंदुत्व व विकासकामांच्या मुद्यावर शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिवसेनेसोबत बंडाचे हत्यार उपसले होते. जवळपास २० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर हे आमदार आता आपआपल्या मतदारसंघात पोहचले आहेत. या आमदारांचे त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागतही केले. त्यानंतर आता हे आमदार माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागले आहेत. नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी शिर्डी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. ‘आमच्या मनात आजही मातोश्रीबद्दलचा जिव्हाळा कायम आहे. आम्हाला आजही मातोश्रीवर येण्याचे आदेश द्यावे, अशी इच्छा आहे. परंतु बोलावणे आले तर एकटा जाणार नाही, सर्वांना सोबत घेऊन जाईन असे मोठे विधान त्यांनी केले.’ कांदे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आम्ही गुवाहाटीत होतो त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना साईबाबांकडे केली होती. बाबांनी माझी मागणी पूर्ण केली आणि मला न्याय दिला त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आलो. राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास व्हावा, असे साकडे बाबांना घेतल्याचेही कांदे म्हणाले. ज्यांच्यावर मी खुप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल, असे म्हणत कांदे यांनी मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल, असेही स्पष्ट केले.
संजय राऊतांवर आमची खदखद नव्हती. आमची कामे होत नव्हती. विकासकामांसाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, संजय राऊत आमच्या चाळीस मतांवर खासदार झाले असतानाही ते आम्हाला रेडा, डुक्कर म्हणालेत. ते मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, असा टोला कांदे यांनी राऊतांना लगावला.












