नाशिक : ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीमध्ये अधिकतम वाढ होऊन विद्युत प्रणाली सुद्धा बळकट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशवासीयांचा सर्व स्तरावर विकास झाल्यामुळे त्याचा फायदा आर्थिकदृष्ट्या सुद्धा होत आहे. नाशिक जिल्ह्यातसुद्धा विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणाची अनेक कामे झाली असून, ऊर्जा क्षेत्रातील विविध यॊजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिकदृष्ट्या तसेच सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ. भारतीताई पवार यांनी केले. त्या आज शनिवारी दि. ३० जुलै रोजी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य “अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर@२०४७” या ऊर्जा महोत्सवाच्या राष्ट्रीय स्तरावरील समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

केंद्र व राज्य सरकारमधील आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या समारोपीय महोत्सवात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकसह देशातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थ्यांसोबत थेट प्रक्षेपणाद्वारे ऑनलाईन संवाद साधला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी ऊर्जा मंत्रालयाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा शुभारंभ केला. त्यांनी एनटीपीसीच्या विविध हरित ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण आणि आणि पायाभरणीही केली. त्यांनी राष्ट्रीय सौर रूफटॉप पोर्टलचे देखील लोकार्पण केले.
या कार्यक्रमात मंचावर आमदार देवयानीताई फरांदे, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे राजीव फरलिया, सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर, महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पायाभूत आराखडा मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे व ज्योतीताई भामरे मंचावर उपस्थित होत्या.
पुढे बोलताना ना. डॉ. भारतीताई पवार म्हणाल्या की , जिल्ह्यात महावितरणच्या वतीने विविध कामे झाली असून सौरऊर्जेच्या माध्यमातून सुद्धा वीज देण्यात येत आहे. विकास कामांमध्ये सर्वानी सहकार्य करण्याची व सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आमदार देवयानीताई फरांदे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ऊर्जा क्षेत्रातील विविध यॊजनाच्या माध्यमातून भारत देश आत्मनिर्भर बनण्यासाठी पाऊले उचलत असुन २०४७ पर्यंत स्वयंपूर्ण होणार आहे. वीजवितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी राज्यशासनाने सुद्धा पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा खात्याकडून करण्यात आलेल्या कामाची व योजनेची माहिती विविध चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील महावितरणच्या वतीने विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर विविध माध्यमांद्वारे या महोत्सवात करण्यात आला. महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या जिल्हयातील लाभार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना योजनेबद्दल व दिलेल्या सेवेबद्दल मत व्यक्त केले. सौंदर्य निर्मिती फिल्म अँड थिएटर, नाशिक यांच्या वतीने दोन लघुनाटिका सादर करण्यात आल्या. यामध्ये विद्युत वितरण यंत्रणा सक्षमीकरण व ग्राहक अधिकार आणि कर्तव्य याची माहिती कलावंतानी नाटिकेमधून दिली. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात दीपक शिरसाठ यांनी बासरी वादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक अभियंता चिदानंद फाळके यांनी तर जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विविध योजनांचे लाभार्थी ग्राहक, लोकप्रतिनिधी, महापारेषण, महानिर्मिती व महावितरणचे कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी व कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.












