गणेश चतुर्थी, दहीहंडीपासून देशात सणांचा माहौल सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
त्यामुळे आधी 34 टक्के असलेला भत्ता 38 टक्के होणार आहे. निवृत्ती वेतनातही तशीच वाढ होईल. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाची मर्यादा सात हजारांवरून थेट 18,000 वर आणली आहे.
आताच्या वाढीचा थेट फायदा 48 लाख सरकारी कर्मचारी आणि जवळ जवळ 68 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. सप्टेंबर 2022 पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पगारवाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै 2022 पासूनची मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि इतर आर्थिक फायदे काय आणि किती असावेत हे ठरवणं तसंच वेळोवेळी महागाई दर आणि जीवनशैलीतल्या बदलांनुसार त्यात बदल किंवा वाढ सुचवणं ही महत्त्वाची कामं वेतन आयोग करत असतो.
महागाई भत्त्यांत 4% वाढ – वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचा आढावा घेण्यात येतो. तेव्हाचा महागाई दर बघून त्यानुसार भत्ता किती वाढणार हे सर्वसाधारणपणे ठरतं.
यंदा जुलै ऐवजी ऑगस्ट महिन्यात हा निर्णय झालाय. महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 38 वर आला आहे आणि पूर्वलक्षी प्रभावाने जुलै 2022 पासून तो लागू होणार आहे.












