मनमाड (योगेश म्हस्के): चांदवड तालुक्यातील उसवाड वरदडी येथील निसर्गाने नटलेले अतिप्राचीन श्री शनिमंदिर , येथे दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि शनी आमवस्येच्या दिवशी भविकांची दर्शनाला मोठी गर्दि होत असते , या ठिकाणाला विशेष असे महत्व आणि तितकाच प्राचीन असा इतिहास देखील आहे.


उज्जैन येथील राजा विक्रम यांच्यावर जेव्हा शनी महाराजांचा कोप झाला तेव्हा त्यांनी साडेसात वर्ष वरदडी येथील परिसरामध्येच सहवास केला होता. राजा विक्रम एके दिवशी घोडा खरेदी करण्यासाठी घोडे बाजारात गेले असता तेथे शनी महाराज देखील आपले रूप बदलून घोडे विक्रीसाठी आले होते जेव्हा राजांनी शनी देवांकडील घोडा पसंद करून घेण्याचे ठरवले तेव्हा शनी देवांनी त्यांना घोडा चालवून पाहण्यास सांगितला जेव्हा विक्रम राजा घोडा चालवण्यासाठी घोड्यावर स्वार झाल्यावर उज्जैन वरून घोड्याने उड्डाण करून संध्याकाळी घोड्याने राजास वरदडी येथील घनदाट जंगलात आणून सोडले , आज देखील घोडा जेथे उतरला ती जागा वरदडी येथे बघु शकतो .राजा विक्रम यांनी आपल्या साडेसातीचा काळ वरदडी येथील परिसरात पूर्ण केल्या वर शनी महाराज प्रसन्न होऊन त्यांनी राजा विक्रमास संगितले की या जागेवर येऊन जो कोणी मनुष्य शरण येईल त्याचा साडेसातीचा प्रकोप कमी होईल आणि त्यांना शनी देव प्रसन्न होतील.


या ठिकाणी शनी देवांच्या सोबतच राहू आणि केतू या दोन ग्रहांची देखील मंदिरामध्ये मुर्ती आहे. येथील परिसर धार्मिक महत्वा बरोबरच डोंगर, झाडे आणि पावसाळ्यात छोटे झरे वाहत असल्याने खुपच सुंदर देखील आहे , श्री शनी मंदिर येथे एक छोटासा धबधबा वाहत असुन भाविक आणि पर्यटक येथे याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहे.













