महाराष्ट्रातील जालन्यात स्टील कंपन्या आणि खासगी व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई करत तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, या कारवाईत 58 कोटी रुपये रोकड, 32 किलो सोनं, हिरे इतर मौल्यवान दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. तीन ऑगस्टपासून ही छापेमारीची ही कारवाई सुरू होती.
लग्नाचे वऱ्हाडी बनून पोहोचले आयकर अधिकारी
राज्यातील सर्वांत मोठ्या बांधकामासाठी स्टीलचं उत्पादन करणाऱ्या चार कंपनीवर हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या नाशिकच्या टीमने ही कारवाई 3 ऑगस्टला सुरू केली.
या कारवाईत 250 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तर तब्बल 120 गाड्यातून अधिकारी जालन्यात दाखल झाले होते. याची माहिती कुठेही फुटू नये यासाठी, छापेमारीत वापरण्यात आलेल्या गाड्यांवर लग्नाचं वऱ्हाड असल्याचं दाखवणारे स्टिकर लावण्यात आले. प्रत्येक गाडीवर ‘वर’ आणि ‘वधू’चं नाव लिहिण्यात आलं होतं.
महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाने इनकम टॅक्सला स्टील कंपन्यांकडून खोटी बिलं दाखवून कर चोरी होत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करत असल्याची माहिती आहे.












