पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात रस्ता नसल्याने दोन जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी पाड्यात वंदना बुधर यांच्या दोन जुळ्या मुलांची प्रसूती घरीच करावी लागली आणि त्यावेळी त्यांच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रस्त्या नसल्याने महिलेला झोळीतून 3 किमी पायपीट करून दवाखाना गाठावा लागला.
एक मुलगी आणि एक मुलगा-जुळ्या बालकांचा मृत्यू
सात महिने गरोदर असलेल्या वंदना बुधर यांना शुक्रवारी (13 ऑगस्ट) अचानक पोटात दुखायला लागलं. पण घरापासून, पाड्यातून दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली.
सातव्या महिन्यातच पोटात कळा सुरू झाल्याने आधीच परिस्थिती गंभीर होती. त्यात डॉक्टरांकडे जायचं कसं हा प्रश्न होता.रस्ता नसल्याने झोळी करून न्यायची वेळ येते. त्यामुळे उपचार मिळण्यासाठी उशीर होतो. 13 ऑगस्टला 108 नंबरवर फोन करून अॅम्ब्यूलन्स सुध्धा बोलावण्यात आली मात्र झोळी करेपर्यंत महिलेने मुलांना जन्म दिला. पुढच्या काही वेळात दोन्ही मुलं दगावली.”यात एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी बालकं दगावली आहेत. एका नवजात बालकाचं वजन 1 किलो 200 ग्राम होतं तर दुसऱ्याचं वजन 2 किलो होतं.
या घटनेनंतर महिलेला डॉक्टरांकडे नेण्याची गरज होती. रस्ता नसल्याने झोळीतून महिलेला दवाखान्यात न्यावं लागलं.
मरकटवाडी पाड्याकडे जाण्यासाठी एकही पक्का रस्ता नाही. पाड्यातून तीन किलोमीटर पायी चालत मुख्य रस्त्यापर्यंत पोहचावं लागतं. मग तिथून साधारण 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात पोहचता येतं.












