तब्बल ११ वर्षानंतर अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत कांडातील दोषींना न्यायालयाने दिली शिक्षा
मनमाड – मालेगावचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हात्यकांडचा ११ वर्षानंतर आज निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मच्छिंद्र सुरवडकर, राजू शिरसाट आणि अजय शंकर सोनवणे असे तिन्ही दोषींचे नाव आहे.
अकरा वर्षापूर्वी दिवसाढवळ्या थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना जिवंत जाळण्याच्या या प्रकाराने केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यच हादरले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २५ जानेवारी २०११ रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाडपासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील इंधन माफियानी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेची देशभरातच चर्चा झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिन्द्र सुरवडकर, राजू सिरसाट, अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पाच आरोपी होते. त्यापैकी पोपट शिंदे यांचा मृत्यू झाला आहे तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायलयात खटला सुरु आहे.
मनमाडजवळच्या पानेवाडी शिवारात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भेसळ माफियांनी तत्कालीन मनमाड अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर पडले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोपट शिंदेसह अकरा जणांना आरोपी करण्यात आले होते. मात्र सोनवणे यांना जाळून मारण्याच्या घटनेवेळी पोपटही भाजला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आता ३ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली आहे. घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले असून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेला जवळपास ११ वर्षे होत आली असून आता आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.












