चार दशकांपासून पाणी टंचाई चे चटके सोसणाऱ्या मनमाड कर नागरिकांसाठी,मनमाड शहरासाठी जीवनदायी असलेली ३०५ कोटी रूपये खर्चाच्या हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे टेंडर अखेर मंजूर करण्यात आले असून येत्या सोमवारी टेंडर निघणार आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. सदर काम ईगल कंपनीला देण्यात आले आहे. योजना अठरा महिन्यांतच पूर्ण केली जाईल असा विश्वास यावेळी आमदार कांदे यांनी व्यक्त केला.
मनमाड येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, सुनील हांडगे, राकेश ललवाणी, स्वप्नील सांगळे, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते. आमदार कांदे पुढे म्हणाले की, मनमाड शहराचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मात्र शहरासाठी जीवनदायी असलेली करंजवन योजना लवकरच कार्यरत होणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून अनेकदा फेर टेंडर काढूनही या योजनेची निविदा भरण्यास कंत्राटदार पुढे येत नव्हते. राज्य शासनाकडून या योजनेसाठीचा प्राथमिक हप्ताही नगरपालिकेकडे जमा झालेला असल्याची माहिती आ.कांदे यांनी यावेळी दिली.
या योजनेसाठी गेल्या तीन महिन्यांत अनेक कंत्राटदार पुढे आले होते. परंतू योग्य त्या पात्रतेच्या कंत्राटदाराची तपासणी सुरू होती. अखेर अनुभवाचा निकष लावून काटेकोर तपासणीअंती या स्वरूपाच्या कामाचा दिर्घकालीन अनुभव असलेली व सुमारे १० हजार कोटी रूपयांचा टर्नओव्हर असलेल्या उल्हासनगरच्या ईगल कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. येत्या सोमवार ता. १४ नोव्हेंबरला या योजनेची नगरपालिकेने दिलेली वर्कऑर्डर कार्यान्वित होईल.
या योजनेचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण योजना असे मनमाड येथे येवून जाहीर सभेत ठेवले होते. आता योजनेचे भूमिपूजन व शुभारंभही मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते पुढील महिन्यांत होईल. त्यानंतर १८ महिन्यांतच ही योजना पूर्ण होईल. गेले ४० वर्षे मनमाडकर ज्यासाठी आतूर होते त्या दररोजच्या पाणी पुरवठ्यासाठी करंजवण योजना वरदान ठरणार आहे.
याचबरोबर मनमाड एमआयडीसीसाठी सध्याची जुनी पालखेड योजना हस्तांतरण केली जाणार असल्याची माहितीही आमदार कांदे यांनी यावेळी दिली. मनमाड एमआयडीसीची जागा निश्चित करून त्यासाठी या योजनेतील पाणी देण्यात येईल त्यामुळे या मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागण्यासही मदत होणार आहे. याचबरोबर मनमाडचे सावित्रीबाई फुले मार्केटचे तसेच महर्षी वाल्मीकी स्टेडियमचे स्ट्रक्चरर ऑडिट झाले आहे. त्यांच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी ५ कोटी रूपये तर नेहरू भवनचेही काम करण्यात येणार असल्याची माहितीही आ.कांदे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.