सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. सुरवातीपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. युवा नेतुत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ या सर्वांचा परिणाम सत्यजित तांबे यांच्या विजयावर झाला.
सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेतृत्व. गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसच्या युवा वर्गाच्या बांधणीसाठी झटत आहेत. मात्र ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज केल्याने सर्व रोख तांबे कुटुंबियांवर आला. मात्र या सगळ्यांचा परिणाम तांबेचा विजय रोखू शकला नसल्याचे निकालावरून दिसून आले. एकीकडे थोरात-विखे घरोब्याचे संबंध आणि दुसरीकडे सत्यजित तांबेंना दिलेले पाठबळ, युवा उमेदवार म्हणून असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क हे विजयाचे शिल्पकार ठरले. गेले 20-22 वर्ष ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करतात. त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे वडील सुधीर तांबे यांचा असलेला संपर्क यामुळेच विजय साकार झाला आहे. सुरवातीला तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक पक्षांकडे पाठिंबा मागणार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे शुभांगी पाटील यांना ऐनवेळी महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. तर दुसरीकडे भाजपने पाठिंबा न देता स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सत्यजित तांबे यांना मदत करा असे सांगितले. अशा पद्धतीचे चित्र हे सगळ्या पाचही जिल्ह्यांमध्ये दिसून आले, त्यामुळे त्याचा एक मोठा परिणाम निकालावर दिसून आला.
सत्यजित तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत. जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदार संघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. पदवीधर मतदारसंघासह राज्यातील अनेक गावागावात जाऊन त्यांनी काँग्रेसचे कामही केले आहे. याच माध्यमातून त्यांनी पदवीधर मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच जोरावर तांबेचा दमदार विजय झाला. नगर जिल्ह्यातील मतदार, कार्यकर्त्यांची मोठी ताकद तांबेच्या पाठीमागे उभी होती. तसेच सोशल मीडिया असेल किंवा युवा वर्गाची काही कामे असतील ती सत्यजीत तांबे यांनी चुटकीसरशी करून दिल्याचे दिसून येते.
मागील तीन पंचवार्षिक वडील सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली. मतदारसंघांमध्ये मतदार नोंदवले, घराघरात जाऊन संपर्क वाढविला. त्यामुळे मागील पंधरा वर्षात सुधीर तांबे यांनी मतदार बांधून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना तीन टर्म शक्य झाल्या आणि चौथी टर्म सुद्धा मुलाच्या रूपाने मिळवली. पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधरांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी उमेदवार मतदारांची नोंदणी करणं, त्यांना बांधून ठेवणं हे सर्व महत्वाचं काम सुधीर तांबे यांनी मागील पंधरा वर्षात करून ठेवलं आहे. शिवाय सर्व प्रकारची ताकद आहे, म्हणजे अर्थसत्ता असेल शैक्षणिक संस्था असतील, या सर्व बाबींवर सुधीर तांबेनी जम बसवलेला होता. त्याचाच फायदा सत्यजित तांबे यांना झाला आहे. नाशिक, धुळे, जळगावमध्ये शैक्षणिक संस्था चालकांनी दिलेली साथ ही देखील जमेची बाजू आहे. या सर्व बाबींमुळे एकेकाळी भाजपाचा असलेला हा मतदारसंघ हळूहळू तांबे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला गेला. सुधीर तांबे नंतर आता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे निवडणुकीच्या रण मैदानामध्ये उतरले होते. या सर्व बाबींचा विचार करता सत्यजित तांबे यांच्यासाठी ही निवडणूक फारशी अवघड गेली नाही, हेच यावरून स्पष्ट होते.
भाजपचा छुपा पाठिंबा
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी अनेक पक्षांकडे जाऊन पाठिंबा मागणार असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्याच सुमारास धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही म्ह्णून त्यांनी यांनी शिवसेनेकडे साकडे घातले. त्यांनतर पाटील यांना महाविकास आघाडीने अधिकृत पाठिंबा जाहीर केला. इकडे भाजपने तांबे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर न करता ऐनवेळी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तांबेना मदत करण्याचे आवाहन केले. यात शिंदे गटाने देखील उडी घेतली. यामुळे सत्यजित तांबेच्या विजयात भाजपने देखील महत्वाची भूमिका बजावलेली दिसते. कारण जर एका अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं तर ‘अपक्ष उमेदवारांने महाविकास आघाडीचा पराभव केला, अशा प्रकारचा एक मोठं चित्र राज्यभर जाईल, असा भाजपचा कयास असावा आणि आजच्या निकालांनंतर ते दिसून आलं.











