वंदे भारत एक्सप्रेस चे शुक्रवारी सायंकाळी मनमाड रेल्वे स्थानकात ढोलताशांचा गजरात आणि नागरिकांच्या टाळ्यांचा कडकडाटात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.भुसावळ विभागातील वरिष्ठ रेल्वेचे अधिकारी मनमाड शहरातील सर्व स्थरातील नागरिक, सर्व राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास म्हणजे विमान प्रवासाची सुखद अनुभूती असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. सुसज्ज अत्याधुनिक डबे असलेली वंदे भारत ट्रेन मध्ये अनेक निमंत्रक मान्यवरांनी गाडीतून शिर्डी पर्यंत प्रवास करून सुखद प्रवासाचा अनुभव घेतला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे यांनी गाडीचे स्वागत केले. यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी स्वतः जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडेच होते.
मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात या गाडीला केवळ तांत्रिक थांबा आहे. व्यावसायिक थांबा अद्याप दिलेल्या नाही. या रेल्वे स्थानकाचे जंक्शन महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्सप्रेस ला मनमाड स्थानकात व्यावसायिक थांबा द्यावा अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.
सीएसएमटी – शिर्डी वंदे भारत रेल्वे गाडीला एकूण १६ डब्बे असून ११२८ प्रवासी क्षमता आहे. पहिल्या दिवशी भुसावळ विभागाने ६०० सोव्हेनीर मोफत तिकिटे दिली होती. यामध्ये १५० सरकारी शाळेतील मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक, १०० प्रसार माध्यम, १२५ आमदार, खासदार राजकिय मान्यवर, १२५ विविध मान्यवर जसे की डॉक्टर, इंजिनियर, उद्योग, रेल्वे ग्राहक आदि आणि १०० रेल्वे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.