मराठी भाषेत निर्माण झालेले साहित्य हे आजवर भाषेच्या गोडव्याने आणि त्यातील लहेजाने वाङ्मयाच्या रूपाने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचले आहे .मराठी भाषा केवळ समृध्दच नाही तर आगामी काळात तिची ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी शासन आणि मायबोलीवर प्रेम करणारे समस्त मराठी प्रेमी लोक यांनी एकत्र येऊन मराठीला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी करूया ,असे आवाहन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाडचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मनमाड महाविद्यालयात मराठी विभाग तसेच महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. शेंडगे प्रा.डॉ. मिलिंद अहिरे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. युवराज भामरे प्रा. अमर ठोंबरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ.पवनसिंग परदेशी , ग्रंथपाल राहुल लोखंडे , शिंदे सर ,आदी यावेळी उपस्थित होते.डॉ.पाटील पुढे म्हणाले की’मराठी भाषा समृद्ध असूनही अनेक वर्षांपासून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला नाही ही खंत आहे . मराठीत इतके दर्जेदार साहित्यिक असून तिला वैभवशाली अशी संत परंपरा लाभलेली आहे. याशिवाय मराठीत लेखन करणारे उदयोन्मुख साहित्यिक यांनी देखील मराठी साहित्य समृद्ध केले आहे, आणि करत आहेत. परंतु अभिजात भाषेचा दर्जा मराठीला अजून मिळू शकला नाही .या पुढील काळात तरी तो मिळावा , यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. डॉ. पाटील यांनी यावेळी त्यांचा स्वित्झर्लंडमधील एक प्रसंग सांगितला. ते स्वित्झर्लंडला गेले असताना त्यांना तिथे एक मराठी भाषिक व्यक्ती आढळला. त्याचे आडनाव देशमुख होते. आणि प्राचार्य पाटील यांनी त्यांना ओळख करून देताना आपणही महाराष्ट्रीयन असल्याचे सांगितले. आणि आपले आडनाव पाटील असल्याचे सांगितले. त्यावेळी कुठलाही संबंध नसताना केवळ मराठी भाषिक आहेत म्हणून त्या माणसाने प्राचार्य पाटील यांना कडकडून मिठी मारली. हे मराठीचे वेगळेपण सांगताना उपस्थितांना गहिवरून आले. मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात महाविद्यालयातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली. यावेळी परिसरातील वारकरी संप्रदायातील पंढरपूरला आषाढी, कार्तिकीला वारी करणारे वारकरी गुणिजन, गायक वादक यांनी टाळ मृदंगाच्या ठेक्यात ,ग्रंथ दिंडीत सहभाग घेतला. मनमाड शहरातून ग्रंथ दिंडीला विद्यार्थी, व विद्यार्थीनीनि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानोबा तुकोबांचे अभंग म्हणणाऱ्या ग्रंथ दिंडीने परिसरातील लोकांचे लक्ष वेधले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले .तसेच डॉ. युवराज भामरे प्रा. अमर ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी पूजा पिंगट तनिषा राऊत यांनी सूत्रसंचालन केले मराठी भाषा गौरव दिन असल्याने सर्व विद्यार्थिनींनी पारंपारिक साडी परिधान करून ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला.













