मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल सोमवारी (ता.३) अखेरच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी एकूण १५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना – भाजप आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत दिसत असली तरी माघारीच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल.
३० एप्रिल रोजी होणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या सह माजी आमदार संजय पवार, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांच्यासह माजी सभापती आणि इतर मोठे नेते निवडणुकीत उतरले आहे.
सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली होती. शिवसेना शिंद गट- भाजप युतीचे तसेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शेतकरी देखील उमेदवारी करू शकणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.
सोसायटी गटाच्या ११ जागांसाठी ८८. ग्रामपंचायत गटाच्या ४ जागांसाठी ३४, व्यापारी गटाच्या २ जागांसाठी १९ तर हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी ९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात बहुसंख्य माजी सभापती व संचालकांचा समावेश आहे.
शेवटच्या दिवसापर्यंत माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, बाळासाहेब मिसर, अप्पा कुरणगर, सतीश पाटील, प्रकाश घुगे, मंडू वडते, दीपक गोगड, गंगाधर बिडगर, देविदास उगले, सचिन दराडे, राजेंद्र वाल्मीक पवार, राजेंद्र नामदेव गिडगे, राजेंद्र सयाजी पवार, सुनील पाटील, डॉ. संजय सांगळे, किशोर लहाने, किसन बंब आदींसह इतर मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने मोठी चुरस दिसून येणार आहे.













