राज्यातील वातावरणात सतत होणाऱ्या बदलाने काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे तर, कुठे उन्हाच्या झळामध्ये वाढ होत आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.आज (14 एप्रिल) राज्यातील बहुतांश भागांमध्ये गारपिट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये सातारा, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकणामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्येसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यामध्ये वादळी पाऊस हजेरी लावत असताना उन्हाचा चटका देखील वाढत चालला आहे. त्यामुळे उकाडा असह्य होत चालला आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर, उर्वरित राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान होते.











