मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र असताना याठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या नांदगाव बाजूकडील गोडाऊन क्रमांक १०२ मध्ये ५ व ६ जूनच्या रात्री ही चोरी झाल्याची घटना आहे.कर्मचारी सकाळी कामावर आल्यानंतर गोडाऊनचे शटर वाकवून चोरी झाल्याचे कर्मचाऱ्यांचे लक्षात आल्याने या घटनेबाबत पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आली.पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
या चोरीमध्ये गोडाऊन मध्ये ठेवलेले एफ आर के ब्रँडची ५५ पोती तांदूळ,अंदाजे २७ क्विंटल ५० किलो वजन,ज्याची बाजारात किंमत रुपये १०,२५७ असल्याची समजते.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या तिसऱ्या क्रमांकाच्या मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊन मधून झालेली ही चोरी म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र असताना सुद्धा सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचा हा प्रत्यय म्हणावा लागेल.त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे समोर येत आहे.यावर प्रशासन काय तोडगा काढते? आणि या चोरीचा गुन्हा कसा उलगडला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












