बकरी ईद सणानिमित्त कत्तलीसाठी गोवंश जनावरांची चोरटी वाहतूक करतांना आणि शहरातील खदानी जवळ कत्तलीसाठी बांधून ठेवलेली अशा दोन्ही ठिकाणी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या ५ गायी, ६ बैल आणि ३४ गो-हे असे एकूण ४५ गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांसह अज्ञाताविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत अकरा लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील पांझन नदीच्या किनारी एफसीआय जवळ असलेल्या खदान शेजारी आज सकाळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने कत्तलीसाठी ५ गायी व ३४ गो-हे असे ३९ गोवंश जनावरे आणुन त्यांना त्रास होईल अशा प्रकारे दोरखंडांनी निर्दयतेने बांधुन ठेवले होते. सदर ठिकाणी छापा टाकून सदर जनावरे ताब्यात घेण्यात आली. सुमारे ६ लाख रुपयांच्या जनावरांची सुटका पोलिसांनी केली आहे. याबाबत अज्ञाता विरुद्ध पोलिस कर्मचारी समाधान देशमुख (वय ३१ वर्षे) यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर शहरातील मालेगाव नाका येथे नाकाबंदी केली असता प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवंश असलेली जनावरे कत्तली साठी रस्त्याने नेली जाणार होती. त्यानुसार येवला – मालेगाव रस्त्याने एक महींद्रा बोलेरो पिकअप नंबर एम. एच. ४८ ए. जी. ५०६७ ही गाडी येवला बाजूकडून मालेगावकडे गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी घेवून जात असताना गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीची ६ बैल पिकअप गाडीमध्ये दोराच्या साहाय्याने जखडलेल्या अवस्थेत एकमेकांच्या पायात पाय अडकलेले असे बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर बैलांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. यावेळी पिकअप चालक मतीन मेहमूद मुलतानी (वय ३९ वर्षे रा. निहारखेडा ता. येवला) आणि त्याच्या सोबत असलेला दुसरा इसमास भिमराज वसंत जठार (वय ३० वर्षे रा. सायगाव ता. येवला) यांना ताब्यात घेतले असून ६ जनावरे आणि पीकप गाडी असा ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संजय ठाकरे (वय ५३ वर्षे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा सत्कार
नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड...











