मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे मनमाड चे माजी आमदार राजाभाऊ देशमुख, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हा प्रमुख नाना शिंदे, भैयासाहेब देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची निकड व भावना आपण स्वतः: आरक्षणाच्या लढ्यातील योध्दे असल्याने जाणून आहात. परंतु न्यायालयीन लढयात तांत्रिक अडचणींमुळे आलेल्या अपयशामुळे संपूर्ण समाज हा प्रचंड निराशेच्या गर्तेत गेला आहे. शैक्षणिक आरक्षण नसल्यमुळे युवक वर्ग हा हताश झाला आहे. व त्याचा परिणाम स्वरूपी व्यसन, गुन्हेगारी तसेच आत्महतेसारख्या विचाराप्रत पोहोचत आहे. दिवसेंदिवस समाजाची परिस्थिती बिकट होत आहे. कुणबी व मराठा एकच असल्याचे विविध आयोगामार्फत सिद्ध होऊनही कायद्याच्या कचाट्यात हा विषय अडवून पडला आहे.
आपल्या सरकारच्या कामाचा वेग व न्याय देण्याच्या पद्धतीचा विचार करता आपल्या सरकारकडून यावर निश्चित मार्ग निघेल, अशी अपेक्षा समाजाला आपल्याकडून आहे. या लढ्यात ९२ सालापासून संघर्षमय प्रवास आमचा सुरु आहे व त्यासाठी आयोगाकडे सर्व नांदगाव तालुक्यातील सर्व विविध समाजांचा पाठिंब्याचे पत्र असलेल्या फाईल्स दाखल केलेल्या आहेत. तरी आपण न्यायालयीन प्रक्रियेत व्यक्तिशः लक्ष देऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.
अशी संपूर्ण मराठा समाजाची आपल्याकडून अपेक्षा आहे. यासाठी केंद्राकडेही पाठ पुरवठा करावा अशी कळकळीची विनंती सकल मराठा समाज नांदगाव तालुक्यातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.














