नांदगाव ( प्रतिनिधी)
“ह्या नभाने या भुईला दान द्यावे ”
असे शेतकऱ्यांसाठी आभाळाकडे पावसाचे पसायदान मागणारे.. निसर्ग कवी तसेच शेती मातीवर आणि माणसांवर भरभरुन प्रेम करणारे..निसर्गकवी जेष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांच आज सकाळी ८.३० वाजता निधन झाले. रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वात शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षाचे होते.
आपल्या निसर्ग काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात नां.धो.महानोर यांनी हक्काचे स्थान निर्माण केले होते. महानोर यांनी काव्यसंग्रहाबरोबरच अनेक मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध गीते लिहिली. त्यांच्या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. व त्यांच्या कवितां काव्यप्रेमींच्या ओठांवर दरवळत आहेत.
शुक्रवारी त्यांच्या पळसखेडे या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सातत्याने आजारी होते. ह्रुदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना वीस दिवसांपुर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळत नव्हता.गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.अखेर आज त्यांची ज्योत मालवली.
ना.धो. महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगाव येथील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पण त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षांपर्यंत झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेती करण्यासाठी पळसखेडला आले. मराठी साहित्य विश्वात ते रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जानवतो. ना.धो.महानोर यांनी पानझड, तिची कहाणी,रानातल्या कविता, अजिंठा आणि गाण्यातुन महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजवले. नांदगावचे ते जावई असल्याने त्यांचे नांदगावकरांवर विशेष प्रेम होते. २०१० मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन करुन अनेक कवी व लेखकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन लिहिते केले. साहित्य क्षेत्रातील बाप आज हरवला आहे. कविवर्य निसर्ग कवी ना.धो. महानोर यांना मराठी साहित्य परिषद शाखा नांदगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!
म.सा.प.शाखा नांदगाव
अध्यक्ष -प्रा.सुरेश नारायणे, नांदगाव











