मनमाड – येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये ३ जुलै 2024 रोजी विद्यालयाच्या 102 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी ,पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व तुलसीदासजी पहुजा होते. तर कार्यक्रमातील दुसरे प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील 1974 च्या बॅचचे माजी विद्यार्थी अरुणजी बोरसे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान विद्यालयातील माजी विद्यार्थी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नाशिक येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व घनश्यामदासजी माधवराव बुवा यांनी भूषवले.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ठाकूर मॅडम व सौ. भामरे मॅडम यांच्या विद्यार्थी समूहाने स्वागत गीत व इशस्तवन करून मान्यवरांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुणे, विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
मान्यवर प्रमुख अतिथी तुलसीदासजी पहुजा अरुण बोरसे यांचा परिचय विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हंडोरे यांनी करून दिला.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष घनश्यामदास माधवराव बुवा यांचा परिचय विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गद्रे सर यांनी करून दिला.
विद्यालयातील मुख्याध्यापक देशपांडे सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, व भेट देऊन सन्मान केला.
व्यासपीठावर विद्यालयातील ज्येष्ठ संचालक मोहन अण्णा गायकवाड, पी.बी. कुलकर्णी सर, गुरुजीत सिंग कांत , रा.शि.स. संस्थेचे संचालक – सचिव राजेंद्र गुप्ता सर , विद्यालयातील मुख्याध्यापक पी.पी देशपांडे, विद्यालयातील दहावी आणि बारावी मधील प्रथम आलेले विद्यार्थ्यांचे पालक शिणकर सर व जनार्दन झाल्टे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यालयातील शिक्षक राजेश पाटील यांनी तयार केलेली कार्यक्रम पत्रिका प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रसंगी राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना विद्यालयातील मुख्याध्यापक देशपांडे सर यांनी आजच्या दिवसाचे विशेष, विद्यालयाचा प्रगतीचा आलेख, व विद्यालयाचे स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास यावर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे पहुजा साहेब यांनी विद्यार्थी, शिक्षक, समाज, पालक व शाळा असा पंचसूत्री कार्यक्रम व त्यातून मिळणारे यश यावर दिलखुलास पद्धतीने अभिमत प्रकट केले.
सायबर क्राईम, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, मानवी जडणघडण भारतातील लग्न पद्धती आणि शिक्षण पद्धती यावर होणारा खर्च अशा विविध बाबींवर माननीय पहुजा साहेब यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमातील दुसरे प्रमुख अतिथी अरुणजी बोरसे यांनी यांनी शिक्षकाची भूमिका , शिक्षकाचे सामाजिक जडणघडण पालकांची बदलती मानसिकता पालकांचे शिक्षकांविषयी असणारे विचार व शिक्षकांवर असणाऱ्या शाळाबाह्य जबाबदाऱ्या यामुळे निर्माण होणारी त्रुटी यावर विचार व्यक्त केले. आपल्या मनोगतात अपयशी यशाची पायरी आहे फक्त शिक्षण न घेता गुणवत्ता वाढविणे हा यशाचा मार्ग आहे असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष घनश्यामदास बुवा यांनी भारतीय प्राचीन शिक्षण पद्धती, योग व खेळाचे महत्व विशद केले. आजची सामाजिक जडणघडणीत मोबाईल आवश्यक असला तरी त्यामुळे निर्माण होणारी सामाजिक पिढी, व बदलत जाणारा व्यक्तिमत्व विकास यावर आपले मत मांडले.
त्यानंतर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व विद्यालयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना इ पाचवी पासून बारावी पर्यंत च्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बुवा परिवारा तर्फे रोख स्वरूपाची घवघवीत बक्षीसे देण्यात आली. दहावी व बारावी मधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पाच हजार एक रुपयाचे रोख रक्कम स्वरूपाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे वाचन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हंडोरे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गद्रे सर व सुतार सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. गायकवाड मॅडम यांनी मांडले.
प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.