
आधीच पावसाने घेतलेली विश्रांती आणि सर्जा-राजाच्या सजावटीच्या साहित्याच्या दरात झालेली वाढ यामुळे सर्जा-राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा साजरा कसा करावा? असा प्रश्न परिसरातील शेतकरी राजाला पडला आहे.
पावसाने गेल्या सव्वा महिन्यापासून ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अशा स्थितीत एकीकडे पिके वाचविण्याची चिंता सतावत असतानाच बैलपोळ्याच्या तोंडावर सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्य दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतमालाचे घसरलेले दर, वाढती महागाई आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे यंदा बैलपोळ्याची खरेदी अत्यंत हात राखून केली जात आहे. परिणामी, दरवर्षी गजबजणाऱ्या बाजारपेठेत यंदा शुकशुकाट असून, व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.











