
वडील जिवंत असताना देखील आजोबांच्या जमिनीवर हक्क मागणाऱ्या एका तरुणाला हायकोर्टाने झटका दिला आहे. नातवाला आजोबांची जमीन मिळणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. वडील जिवंत असताना नातू आजोबांच्या जमिनीवर हक्क सांगू शकतो का? राजस्थानमधील अशाच एका जमिनीच्या प्रकरणात नातवाने त्याच्या आजोबांची ७५ बिघे जमीन विकण्याच्या वडील आणि काकांच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. या नातवाने दावा केला की, आजोबांच्या जमिनीत त्याचा वाटा आहे आणि त्यांच्या संमतीशिवाय ती जमीन विकली जाऊ शकत नाही. पण हे प्रकरण केवळ आजोबांच्या जमिनीपुरते मर्यादित नव्हते. प्रश्न असा होता की, आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना वारसा हक्काने मिळालेली जमीन नातवासाठी वडिलोपार्जित मालमत्ता बनते की वडिलांचा वैयक्तिक वारसा.
राजस्थान हायकोर्टाने आजोबांच्या जमिनीवरील नातवाच्या हक्कांबाबत एक महत्त्वाचा निकाल दिल. हायकोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, फक्त जमीन आजोबांची होती म्हणून नातू त्यावर जन्मसिद्ध हक्क किंवा वडिलोपार्जित हक्काचा दावा करू शकत नाही. जर आजोबांचे मृत्युपत्र न करता निधन झाले आणि त्यांची मालमत्ता हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ च्या कलम ८ अन्वये त्यांच्या प्रथम श्रेणीच्या वारसांना मिळाली तर मालमत्तेतील मुलाचा वाटा हा त्याचा वैयक्तिक वारसा मानला जाईल. अशा परिस्थितीमध्ये वडील जिवंत असताना मुलगा किंवा नातू मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या विक्रीला आक्षेप घेऊ शकत नाही. कोर्टाने दिलेल्या निकालाने नातवाला धक्का बसला.










