आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रात कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला १० हजार धावा पूर्ण करण्यास फक्त ७१ धावांची गरज आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला १० हजार धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराटने आतापर्यंत ३११ टी-२० सामन्यात ९ हजार ९२९ धावा केल्या आहेत. यात पाच शतक आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी ४१.७१ तर स्ट्राइक रेट १३३.९५ इतका आहे. विराटनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर ३५० टी-२० सामन्यात ३२.१२च्या सरासरीने ९ हजार ३१५ धावा आहेत. या काळात त्याने ६ शतक आणि ६५ अर्धशतक केली आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४४४ सामन्यात ३७.०२च्या सरासरीने १४ हजार २१९ धावा केल्या आहेत. गेलच्या नावावर २२ शतक आणि ८७ अर्धशतक आहेत. या यादीत कायरन पोलार्ड ११ हजार १३३ धावांसह दुसऱ्या, पाकिस्तानचा शोएब मलिका १० हजार ८०२ धावांसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिाचा डेव्हिड वॉर्नर १० हजार ०१७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. विराट पाचव्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने १९९ सामन्यात ६ हजार ०७६ धावा केल्या आहेत. यात ५ शतक आणि ४० अर्धशतक आहेत. शिखर धवन ५ हजार ५७७ धावांसह दुसऱ्य तर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना ५ हजार ४९१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
RCBला अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहलीच्या संघाने पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली होती. तशीच कामगिरी दुसऱ्या सत्रात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.












