भारताच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाला भारतीय संघाने ३ टी-२० सामन्याच्या मालिकेत ३-० ने पराभूत करीत क्लीन स्वीप दिला आहे. काल झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच टी 20 मालिकेत टीम इंडियाने मोठा पराक्रम केला आहे.
तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव 111 धावांवर आटोपला. सलामीवीर मार्टिन गुप्टीलने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही.
टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दीपक चाहर, युजवेंद्र चहल आणि वेंकटेश अय्यरने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
दरम्यान त्या आधी टीम इंडियाने टॉस जिंकून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने यामध्ये 3 सिक्स आणि 5 चौकार लगावले. त्या व्यतिरिक्त इशान किशनने 29, श्रेयस अय्यरने 25, दीपक चाहरने नाबाद 21 तर व्यंकटेश अय्यरने 20 धावा केल्या.













