loader image

रोज फिरायला जाण्याचे फायदे !

Dec 23, 2021


तुम्हालाही सकाळी चालायला जायची सवय आहे का? नसेल तर वेळेवर ही सवय लाऊन घ्या. सकाळी चालण्याचे फायदे तुम्हाला खूपच जास्त प्रमाणात मिळतात. दिवसभर तुम्हाला शरीरात उत्साह हवा असेल आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही किमान सकाळी अर्धा तास तरी चालायला हवे. सकाळी चालण्याने तुम्हाला दिवसभर एनर्जी तर मिळतेच. पण तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता.

सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिवसाचा पहिला प्रहर हा अप्रतिम आणि कमी प्रदूषित असतो. शहरामध्ये प्रदूषणाचा खूपच त्रास असतो. पण सकाळच्या या प्रहरी प्रदूषण कमी प्रमाणात असते आणि हवा स्वच्छ असते. ज्यामुळे मनाला शांतता मिळते आणि शरीराला अधिक ऊर्जाही प्राप्त होते. पायी चालण्याने तुमच्या शरीराचा व्यायामही होतो आणि दिवसभर शरीरामधील एनर्जी चांगली टिकून राहाते. तसंच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सवयीमुळे तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची योग्य सवय लागते आणि ज्यामुळे शारीरिक आजार कमी होतात.

सकाळी चालण्याचे फायदे :

सकाळी चालण्याचे फायदे अनेक आहेत. त्यापैकीच काही फायद्यांविषयी  आपण जाणून घेणार आहोत.

नैराश्यमुक्त आयुष्य :

आपण अशा वातावरणात राहतो जिथे अनेक आजाराचे मूळ हे नैराश्य अर्थात डिप्रेशन आहे. अनेक आजारांच्या मागे हे एकच कारण दिसून येते.  हा आजार दिसत नसला तरी यामुळे अगदी मृत्यू ओढवतो  इतका हा आजार भयानक आहे. पण तुम्हाला या आजारातून सकाळी चालण्याने नक्कीच फायदा मिळू शकतो. सकाळीच लवकर उठून चालायला गेल्याने मन स्वस्थ राहते आणि अंगातील आळसही निघून जाण्यास मदत होते. सकाळी चालण्याने मन हलके होते आणि डोकंही शांत राहण्यास मदत मिळते. नैराश्यग्रस्त व्यक्ती  जर रोज सकाळी 20-40 मिनिट्स चालली तर नैराश्याचा स्तर कमी झाल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. डिप्रेशनमधून निघण्यासाठी तुम्ही रोज सकाळी किमान अर्धा तास तरी चालायला हवे.

हृदय रोगासाठी फायदेशीर :

मॉर्निंग वॉक अर्थात सकाळी चालण्याचा सर्वात मोठा फायदा मिळतो तो हृदयाला. सकाळी नियमित चालण्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते आणि हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका कमी असतो. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांना नेहमीच डॉक्टरही चालण्याचा सल्ला देतात. यामुळे रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो ज्यामुळे हृदयाला धोका राहात नाही. एका शोधानुसार सकाळी चालण्यामुळे हृदयसंबंधित धोका साधारणतः 31 टक्के आणि मरण्याचा धोका 32 टक्के कमी होतो. पुरूष आणि महिलांना दोघांनाही याचा फायदा होतो.

मधुमेही रुग्णांकरिता वरदान :

मधुमेही व्यक्तींना सर्वात पहिला सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो तो म्हणजे सकाळी चालायला जाणे.  मधुमेह हा अनियंत्रित जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. पण तुम्ही सकाळी चालायला गेल्यामुळे ही समस्या काही प्रमाणात तुम्ही आटोक्यात आणू शकता.  केवळ सकाळी अर्धा तास चालल्याने तुमच्या शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.  तर टाईप – 2 चा मधुमेह संपुष्टात आणण्यासही याची मदत मिळते.  तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळा पाळण्यासह आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासह सकाळी चालण्याचा फायदाही  मधुमेहासाठी करून घेऊ शकता.

कॅन्सरवरही गुणकारी :

सकाळी चालण्याचा एक फायदा कॅन्सरग्रस्तांनाही होतो. अर्थात कॅन्सर बरा होत नसला तरीही शरीर कमजोर होऊ न देण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो.  तज्ज्ञांच्या मते कॅन्सरचा धोका सुस्त आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अधिक होतो. त्यामुळे सकाळी चालण्याने मुळात कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत मिळते. सकाळी तुम्हाला हवेत अधिक फ्रेशनेस मिळतो आणि तुमची प्रतिकारशक्ती प्रणाली मजबूत राखण्यास याचा फायदा मिळतो. ज्यामुळे कॅन्सरशी लढण्यास बळ मिळते. स्तन, किडनी,  ओव्हेरियन आणि सर्व्हाईकल अशा कॅन्सरशी लढा देण्यास याचा फायदा मिळतो. 

वजन कमी करण्यासाठी उत्तम :

आहार नियंत्रणासह सकाळी चालण्याचा उत्तम फायदा म्हणजे वजन कमी होते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हा उत्तम उपाय आहे. अनियंत्रिण खाणे आणि वाईट जीवनशैलीमुळे वजनवाढ ही सध्याची समस्या झाली आहे. शारीरिक परिश्रमाशिवाय आपल्याला खाणे पिणे हवे असते. त्यामुळे वजन वाढू लागते. पण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज न चुकता तुम्ही सकाळी किमान अर्धा तास  ते पाऊण तास चालयला हवे. याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होते. तज्ज्ञांनुसार आहारातील बदलाशिवायदेखील सकाळी चालण्याने वजन कमी होते. अभ्यासानुसार सकाळी चालल्याने शरीरातील फॅट कमी होतात आणि शरीरातील लचक अधिक वाढते तसंच मांसपेशींनाही मजबूती मिळते. पण याबरोबर आहारावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे.

थकवा जातो :

सकाळी  चालण्याचे फायदे पाहिले तर त्यामध्ये ऑक्सिजनचा चांगला पुरवठा मिळून थकवा निघून जाण्यास मदत मिळते. दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि थकल्यासारखे वाटत नाही. सकाळी ताजी हवा शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला दिवसभर त्यामुळे थकवा आल्याचे जाणवत नाही. इतकंच नाही तर तुम्ही आजारातून जरी उठलात तरी सकाळी चालण्याने तुम्हाला योग्य फ्रेशनेस मिळतो आणि त्यामुळे दिवसभर सतत कंटाळवाणे वाटत नाही आणि चिडचिडही होत नाही.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त :

रोज सकाळी चालण्याने शरीरामधील रक्तप्रवाह उत्तम राहतो आणि ज्याचा सकारात्मक प्रभाव प्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहिल्याने ऑक्सिजनचा त्रास होत नाही आणि ऑक्सिजनमध्ये सुधारणा होते. दिवसाला अर्धा तास चालण्याने तुमची इम्यून सिस्टिम अधिक मजबूत होते आणि आजाराशी लढा देण्यास मदत  करते. 

तणावमुक्तता :

घर असो वा ऑफिस सध्या सगळंच वातावरण तणावग्रस्त झालेले असते. तणावाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. पण यापासून तुम्हाला सकाळी चालण्याने अधिक फायदा मिळतो. तणानामुळे शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होत असतो. यातून बाहेर पडण्यासाठी सकाळी चालण्याने फायदा मिळतो. मॉर्निंग वॉकमुळे डोक्यापासून ते पायापर्यंत रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो. तसंच सकाळची ताजी हवा तुम्हाला तणावापासून मुक्त राहण्यासाठी फायदेशीर ठरते.

अधिक उत्साह मिळतो :

सकाळी लवकर उठून चालायला गेल्याने अधिक एनर्जी मिळते आणि त्यामुळे सकाळची कामंही त्या एनर्जीमध्ये पटकन आटपतात. अंगात आळस येत नाही. शरीर अधिक ऊर्जावान करण्यासाठी सकाळी चालायला जायला हवे. थकवा आणि तणाव दोन्ही दूर करून उर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत मिळते. तसंच शरीरामध्ये ऑक्सिजन पर्याप्त स्वरूपात मिळथे आणि ऊर्जेचा स्तर व्यवस्थित टिकून राहातो.

चांगली झोप लागते :

सकाळी लवकर उठून चालण्याने रात्री झोपही चांगली लागते. दिवसभराचा तणाव बऱ्याचदा रात्रीची झोपही खराब करतो. त्यामुळे शरीराला योग्य आराम मिळत नाही. पण सकाळी लवकर उठून चालण्याची सवय लावल्यास रात्री झोपही चांगली लागते. तणावमुक्त  राहिल्याने आणि शरीर निरोगी राहिल्याने रात्री झोपेची समस्या येत नाही. तसेच दिवसभर फ्रेश वाटते. 

रोज फिरायला जा आणि स्वतःला निरोगी ठेवा.


अजून बातम्या वाचा..

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

चांदवड - मनमाड मार्गाच्या  दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने इंदौर पुणे  महामार्गावर रोजच वाहतूक...

read more
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल...

read more
.