मनमाड शहरासह परिसरातील ग्रामीण भागात चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. यात कांदे, गहू हरभऱ्यासह विविध पिकांवर धुके पडल्याने रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पिकांवर औषधी फवारणी करण्याची लगबग शेतकऱ्यांकडून सुरू असून महागडी औषधे घ्यावी लागत असल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.
यंदा हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषंगाने रोगांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मनमाड शहरासह ग्रामीण भागातील पीक सध्या धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली जात असून उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावू लागली आहे.
कांदा, गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी, सोयाबीन, हरभरा आदी पिकांची पेरणी केली. अगोदर परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत आहे ती पिके वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच आता मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, पहाटेच्या वेळेस दाट धुके पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाल्याने कांदा पिवळा पडू लागला आहे. तसेच वाढही खुंटली आहे. मात्र वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक अडचणीत टाकले आहे. रब्बी पिके वाचविण्यासाठी सध्या परिसरातील शेतकरी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहे.
महागडी औषधे फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल असून आर्थिक अडचणी सापडला आहे.












